Saturday, January 22, 2011

15) तुकाराम महाराजांच्या गाथेतील रामदासी करामती...

तुकाराम महाराजांच्या गाथे मधील काही ओळी रामदासी शिष्याने घुसवलेल्या आहेत.. त्यावर..सखोल प्रकाश सदानंद मोरेंनी टाकलेला आहे..त्यांनी तुकाराम गाथा, देहू प्रतीची प्रस्तावना लिहितांना त्यात नमूद केलेले आहे.. ते पुढील प्रमाणे..
=====
                          "पंडिती प्रतीत दुबार आलेले अभंग प्रस्तुत प्रतीत एकदाच घेण्यात आलेले आहेत. प्रचलित पंढरपूर केंद्रित प्रतींपेक्षा या प्रतीत जास्त अभंग आहेत. पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. तिचा खुलासा करणे भाग आहे.

॥शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा,
कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग॥'

             या मथळयाखाली पंडिती प्रतीत १४ अभंग येतात. त्यांतील ९ अभंग पंढरपूर प्रतीत व वारकऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत सापडतात. पंडिती प्रतीतील अतिरिक्त 5 अभंग प्रस्तुत गाथ्यात आम्ही वगळले आहेत. हे अभंग सरळ सरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत. अशा प्रकारचे प्रक्षेप होण्याचे एक कारण म्हणजे मूळ वहीत कोरी राहिलेली पाने.
उपर्युक्त पाच अभंगांतील (महाराष्ट्र शासनाची आवृत्ती, अभंग क्रमांक १८८६-१८९०) तुकाराम महाराजांचे स्वतः विषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत.
                               परंतु हा काही आमच्या व्यक्तिनिष्ठ धारणेचा भाग नव्हे. तुकाराम महाराज शिवरायांना रामदासांकडे जायला सांगत असतील, तर त्याला आम्ही कोण हरकत घेणार ? पण ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे, की इ. स. १६५० पर्यंत रामदास कृष्णाकाठी नुकतेच येऊन, दाखल होऊन, कार्य करू लागले होते व त्यांची माहिती फारशी कोणाला असण्याची शक्यता नव्हती. त्यांना मानमान्यताही मिळाली नव्हती. उलट, तुकोबा प्रसिध्दीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर होते. अशा परिस्थितीत ते स्वतःची अशी निंदा करीत शिवबांना विन्मुख पाठवतील, हे शक्य नाही
.
                  पण मुद्दा केवळ शक्यतेचाही नाही. ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा सद्भावनेने (good faith) हे अभंग रचले, तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्यामुळे त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना प्रतिनिधी, राजाज्ञा अशा शिवोत्तर काळातील अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, १६५० पर्यंत ज्याला शिवरायाचे नावही माहीत असणे सुतराम् शक्य नव्हते, तो भूषण कवी शिवदरबारात आणून बसवला आहे आणि सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील दोन नावे असली; तरी ती दोन स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदनामे मानली आहेत. त्यातही मौज अशी, की शिवराज्यभिषेकापर्यंत प्रचलित असलेल्या डबीर या फारशी भाषेतील शब्दाला सुमंत हा पर्याय राज्यव्यवहारकोशामुळे त्यानंतर प्रचलित झाला. रामदासभक्तांनी भूषण कवीप्रमाणे राज्यव्यहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही १६५० पूर्वी पुणे परिसरात दाखल करण्याचा चमत्कार केला आहे.
               अर्थात या प्रसिध्द रचना रामदासभक्तांच्या असल्या, तरी त्यांचा समावेश देहू वा तळेगाव प्रतीत करण्याचे काम मात्र त्यांचे नव्हे. त्याच्या निदान दोन शक्यता आहेत. १) देहू प्रतीची नक्कल करणारे त्र्यंबक कासार यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या (तळेगाव) प्रतीत समाविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळया पाठांचा समावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम होय. २) अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने उपर्युक्त रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तिथून ते त्र्यंबक कासाराच्या वहीत नकलले गेले.
                      मुळात रामदासी संप्रदायातच या अभंगांची निर्मिती कशी झाली, याचा उलगडा करणेही फारसे अवघड नाही. मल्हार रामराव चिटणीस हे शिवशाहीचे बखरकार अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेले. त्यांचा रामदासांच्या संप्रदायाशी निकट संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. हनुमंतस्वामीच्या रामदासांच्या बखरीची वाढीव दुसरी आवृत्ती स्वामींच्याच आज्ञेवरून चिटणीस व मेढे यांनी तयारकेली.
 
                 शासकीय प्रतीतील उपर्युक्त अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजी त्तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात, हे सांगितले, म्हणजे या प्रक्षेपांचा वेगळा उलगडा करायची गरज नाही. चिटणीस, हनुमंतस्वामी व कदाचित मेढे यांनी भेटीचे वर्णन करताना बहुधा हे अभंग रचले असावेत. अर्थात त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यांना वाटायचे काही कारण नव्हते. त्यांनी केले, ते प्रामाणिकपणे व रामदासांचा महिमा वाढविण्यासाठी. ही घटना खरोखर घडली व तुकोबांनी शिवरायांना रामदासांकडे जायला सांगितले, ही त्यांची प्रामाणिक समजूत होती. तिच्या पोटी त्यांनी हे केले. तुकोबांनी शिवरायांना गद्यात उपदेश करण्याऐवजी अभंगांत करणे अधिक सयुक्तिक वाटल्याने त्यांची गद्याऐवजी पद्य अभंग करून ते मूळ अभंगांची ओळ विस्कळीत करून त्यांच्यांत मध्येच घुसडले. पण त्यामुळे वृत्तविसंगती निर्माण होते, ओघ बिघडतो, हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु साताऱ्याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांची अडाणीपणे अभंगांत आणली. अर्थात त्यांच्या अडाणी प्रामाणिकपणामुळेच प्रस्तुत प्रक्षेप ओळखणे शक्य झाले. असो.

=============सदानंद मोरे..

संदर्भ - प्रस्तावना - श्रीतुकाराम गाथा (देहू प्रत) - सदानंद मोरे
तपासून घ्यायचे असेल.. तर प्रस्तावना असलेली मूळ लिंक =http://www.tukaram.com/marathi/lekh/prastavana_gatha.asp     

==============================
  माझे मत -- तुकाराम महाराजांच्या गाथे मधील प्रक्षेप बघता..किती प्रमाणात  इतिहासात प्रक्षिप्त झालेला आहे तो कळून येतो....
त्या काळात रामदासी भक्तांनी अश्या प्रकारची कृत्ये केलेली आहेत...रामदास स्वामींची महानता वाढवण्यासाठी, स्वामी भक्तीसाठी केलेले असेलही.. पण हेच कार्य.. "प्रत्येकाच्या' शिष्यांनी करायचे ठरवले तर.. चालेल का???  रामदास स्वामींच्या भक्तांनी ह्या असल्या बाबी ध्यानात घेऊन त्या चुका सुधारल्या तर चांगलीच गोष्ट आहे.. पण अजूनही स्वामींची महानता जपण्यासाठी उगाच "गुरु" पद जर हे भक्त मिरवणार असतील.. तर बहुसंख्य लोकांनी त्या विरोधात आपले डोळे उघडले पाहिजेत...
अध्यात्माचा  आणि भक्तीभावनेचा मुलामा देऊन रामदासांना शिवरायांचे "गुरुपदी" बसवण्याचे प्रयत्न बहुसंख्य लोकांनी जुगारून लावले पाहिजे...बहुसंख्य लोकांना लिहिता वाचता येते..पण  लिहिण्या वाचण्याच्या पुढे देखील बहुसंख्य लोकांनी जायला हवे.. आणि हे असले रामदासी शिष्यांचे धूर्त प्रकार ओळखायला हवेत...बहुसंख्य समाज जागा झाला तर संख्येने तुरळक अश्या रामदासी भक्तांच्या फसवेगिरीला आळा बसेल....फसवणुकीवर कायमचा उपाय म्हणजे बहुसंख्य समाजाला ह्या बाबतीत जागरूक करणे..आणि हि जागरुकता.. प्रत्येक जागुरूक व्यक्ती आपापल्या ठिकाणांवरून करू शकतो..एका जागरूक माणसाने आजूबाजूच्या दहा लोकांना ह्या फसवेगिरी बाबत सांगितले तर निदान त्या दहा पैकी ४ माणसे तरी जागरूक होतील आणि अश्या फसवेगिरीला बळी पडणार नाहीत...
        जागरुकता कशासाठी..??- आज जर जागरूक झालो नाही तर उद्या.. आपलाच इतिहास आपल्या वंशजांना यथोचित जाणार नाही....आपल्याच इतिहासात आपणच परके होणार  ...
                       या आधीही शिवरायांच्या स्वराज्याच्या कृतीचे श्रेय रामदासी भक्तांनी रामदासांकडे घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत..त्या त्या वेळेस आपल्यातील जागरूक लोकांनी  अश्या गोष्टींना तीव्र विरोध केलेलाच आहे.. आत्ता ती जवाबदारी आपल्यावर आलेली आहे..मधल्या काळात गाफील राहिल्याने रामदासी भक्तांनी बरीच प्रगती केली फसवणुकी मध्ये.. पण आत्ता आपल्या पिढीने दाखवून द्यायला हवे कि या पिढीतील शिवरायांच्या मावळ्यात, त्याच्या मनगटातही  भरपूर ताकद आहे.. आणि आत्ता रामदासी शिष्यांच्या ह्या असल्या  फसवेगिरीवर आम्ही कायम स्वरूपाचा प्रतिबंध केल्या शिवाय निश्चिंत बसणार नाही... 

No comments: